
छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत
मुंबई.दि.११-महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील ११ किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ 22 ते 26 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार यांनी केले. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश होता.
महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे, या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात आले होते. अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 किल्ल्यांचा आज युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला.