शिवकृपाच्या संमिश्र व्यवसायामध्ये रू. 536 कोटींची विक्रमी वाढ-संस्थापक व अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण.
एम.जे.न्युज.सातारा.

शिवकृपाच्या संमिश्र व्यवसायामध्ये रू. 536 कोटींची विक्रमी वाढ-संस्थापक व अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण.
एम.जे.न्युज.सातारा.
सातारा.दि.17.आदर्श व अग्रगण्य, दिपस्तंभाप्रमाणे कार्यरत असलेल्या आणि महाराष्ट्र शासनाचा सहकार भुषण पुरस्कार प्राप्त शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई या संस्थेने दि. 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष अखेरीला एकूण रू. 5125 कोटींचा संमिश्र व्यवसाय पुर्ण करून एक माईल स्टोन गाठला आहे. असे गौरवोद्गार संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण यांनी काढले.
दि. 31 मार्च 2025 अखेर संस्थेच्या ठेवी रू. 2908 कोटी, कर्जे रू. 2217 कोटी, असा एकूण रू. 5125 कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा संस्थेने पार केला आहे. या आर्थिक वर्षात रू. 536 कोटी संमिश्र व्यवसायात वाढ झाली आहे. संस्थेचे एकुण निधी रू. 367 कोटी असून, तरलतेपोटी संस्थेने विविध बँकामध्ये रू. 1165 कोटी गुंतवणूक केली आहे. सुरक्षित कर्ज वितरण, कर्ज वसुलीत सातत्य व प्रभावी नियंत्रण ठेवून नियोजनबध्द काम करून थकबाकी कमी करण्यात यश मिळवले आहे. संस्थेस एकुण रु. 60 कोटी ढोबळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण यांनी दिली.
शिवकृपा पतपेढीचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून संस्थेच्या एकूण 102 शाखा, 02 क्षेत्रिय कार्यालये, 10 स्वतंत्र विभागीय कार्यालये व शिवकृपा भवन हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे रबाळे, नवी मुंबई येथे प्रशस्त प्रशासकीय कार्यालय कार्यरत आहे.
सहकाराला अध्यात्माची जोड देवून सहकार क्षेत्रात काम करीत असताना अर्थकारणाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणे हे शिवकृपाने आद्य कर्तव्य मानून संस्था समाजाभिमुख कार्य करीत आहे. शिवकृपा पतपेढीस महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार, ‘सर्वोत्कृष्ट आदर्श पतसंस्था पुरस्कार, ‘राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार”, “बैंको पतसंस्था पुरस्कार” आणि ‘प्रतिबिंब वार्षिक अहवाल स्पर्धा मुंबई विभागातून प्रथम पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला आहे. विविध मान्यवर संस्थांनी संस्थेस एकूण 19 पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे. संस्थेच्या सभासदांना तत्पर, कार्यक्षम व दर्जेदार सेवा देता यावी या हेतूने संस्थेचे कर्मचारी व प्रतिनिधींना शासन मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रातुन वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. संस्थेचे कोरेगाव जि. सातारा येथे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र आहे. संस्थेने ठेवी, कर्ज, वितरण व वसुली या प्रत्येक स्तरावर केलेली उत्तम कामगिरी ही अत्यंत आनंददायी असल्याचे मत संस्थेचे संस्थापक व उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत वंजारी यांनी व्यक्त केले.
संस्थेचे समासद, ठेवीदार, ग्राहक, कर्मचारी, प्रतिनिधी व संचालक मंडळ या सर्वांचे योगदान याकरिता महत्वपूर्ण आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच संस्थेस व्यवसाय बाढीचा उल्लेखनीय टप्पा पार करता आला. संस्था या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांचे मनापासून अभिनंदन करीत आहे. असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण यांनी केले.